पहलगाम हल्ल्याची कल्पना सरकारला तीन दिवस आधीच होती   

खर्गे यांचा केंद्र सरकारवर आरोप 

रांची : जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याचा अहवाल गुप्तचर संस्थांनी पहलगाममध्ये हल्ल्यापूर्वी तीन दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला होता, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी केला  
 
झारखंडची राजधानी रांची येथे काँग्रेस पक्षातर्फे घटना बचाव मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यात ते म्हणाले, अहवाल प्राप्त झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा नियोजित काश्मीरचा दौरा रद्द केला होता, दरम्यान, १९ एप्रिल रोजी मोदी कतरा ते श्रीनगर अशा रेल्वेमार्गाचे उद्घाटन करणार होते. त्यापूर्वी तीन दिवस अगोदर गुप्तचर विभागाचा अहवाल मोदी यांना मिळाला होता, असा आरोप खर्गे यांनी केला. ते म्हणाले, सर्वपक्षीय बैठकीत सरकारने कबूल केले की, दहशतवादी हल्ला गुप्तचर विभागाचे अपयश होते. केंंद्र सरकार काश्मीरच्या नागरिकांची सुरक्षा करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे सरकारला जबाबदार ठरवले पाहिजे, 
 
काँग्रेस सरकारच्या पाठीशी  
 
पहलगाम दहशतवादी हल्ल्यांंना जबाबदार असणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. केंद्र जो निर्णय घेईल त्याला काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा आहे. पहलगामचा दहशतवादी हल्ला हा देशावर झालेला हल्ला असल्याचे काँग्रेस मानते. धर्म आणि जातीपेक्षा देश सर्वोच्च आहे, अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे केंद्राच्या कोणत्याही निर्णयाला काँग्रेसचा पाठिंबा असेल, असेही खर्गे यांनी स्पष्ट केले.

Related Articles